विजबील वसुली तात्काळ थांबवून वीज जोडणी पूर्ववत करा - आमदार संजय मामा शिंदे .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी अगोदरच अडचणीत असताना सध्या वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली विज बिल वसुली अन्यायकारक असून महावितरण कडून शेतीपंप व घरगुती वीज बंद करण्याचे जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबवावे व वीज जोडणी पूर्ववत करावी अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले की , अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.पाऊसच एवढा होता की शेताला पाणी लागली त्यामुळे शेतीपंपासाठी विजेचा वापरही शेतकऱ्यांना करता आलेला नाही ,असे असतानाही शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे हे चुकीचे आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना त्याला विज बिल भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे. तसेच विज बिल भरणे विषयी पूर्वसूचना ही महावितरण कंपनीने द्यायला हवी .असे कोणतेच काम महावितरण कंपनीने केलेले नाही सरसकट वीज बंद करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने ही अन्यकारक वसुली तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिक व पशुधनाला पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी ,बँका ,शासकीय कार्यालय यांनाही काम करण्यास अडचणी येत आहे .त्यामुळे महावितरण कंपनीने या सर्व बाबींचा विचार करून वीज तोडणी थांबवावी व विज जोडणी पूर्ववत करावी अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा