Breaking

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

करमाळा तालुक्यातील विजेचे संदर्भात सोमवारी तहसील कार्यालयासमोर पाटील गटाच्या वतीने धरणे आंदोलन


करमाळा तालुक्यातील विजेचे संदर्भात सोमवारी तहसील कार्यालयासमोर पाटील गटाच्या वतीने धरणे आंदोलन 



करमाळा प्रतिनिधि/ अलिम शेख


तालुक्यातील वीजेच्या संदर्भात सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. करमाळा तालुक्यातील काही भागात विशेषतः उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज पुरवठा हा महावितरण कडून खंडीत केला गेला असून शेतकरी वर्गात याबाबत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या प्रश्नावर महावितरणचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसिलदार यांना एक निवेदन सादर करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील कृषीपंपाचा वीजपुरवठा गेले दहा दिवसापासून बंद करण्यात आला आहे. महावितरण विभाग वीजबिल वसुलीचे कारण दाखवून कृषीपंप वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम अधिक वेगाने करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. करमाळा तालुक्यातील ऊस, केळी, द्राक्ष या नगदी पिकासह भाजीपाला व इतर पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील उभ्या पिकांचे पैसे, ऊस व केळी बिलाची रक्कम हाती आल्यानंतर अवश्य स्वतःहुन वीज बिल भरतो पण आता वीजजोड तोडू नका अशी विनंती शेतकरी महावितरणला करत असताना सुद्धा महावितरणकडून या वीजतोड मोहीमेस ब्रेक लागत नाही.यामुळेच आता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न सुटावा म्हणून सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आपण स्वतः करमाळा तहसील कार्यालया समोर लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहोत,असे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तर या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, उर्जाराज्यमंत्री ना. तनपुरे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख,अधिक्षक अभियंता महावितरण, उपविभागीय अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता महावितरण, उप अमियंता करमाळा, पोलिस निरीक्षक करमाळा आदिंना पाठवले असुन शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा