शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्या - खा. हेमंत पाटील ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडे मराठवाड्यासाठी विशेष बैठकीची मागणी
--------------------------------------------------------
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना कृषी कर्जपतपुरवठा करण्यासाठी अकार्यक्षम ठरत असून अनेक वर्षांपासून बँका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत नाहीत.याबाबत वारंवार सूचित करून सुद्धा निर्धारित वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले जात नाही या व अन्य मागण्यांसंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेऊन याबाबत बँकांवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवून देण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आणि यासंदर्भात मराठवाड्यासाठी विशेष बैठक बोलावण्याची मागणी केली . मंत्री महोदयांनी याबाबत सकारत्मक प्रतिसाद देत बँकांच्या कारभारावर योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले .
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कोरोना,अतिवृष्टी , नापिकी यामुळे पूर्वीपासूनच आर्थिक संकटाचे चटके सोसत आहेत आणि त्यात बँकांच्या अकार्यक्षमतेची भर अधिक त्रासदायक ठरत आहे. मतदारसंघातील जिल्हास्तरीय पतपुरवठा कमिटीने निर्धारित केलेले कृषी पतपुरवठा व अन्य कर्जाचे लक्ष्य अजूनही राष्ट्रीयकृत आणि अन्य संबंधित बँकांनी पूर्ण केलेले नाही. मागील वर्षी जेवढ्या खात्यांचे लक्ष्य दिले होते, तेवढे देखील बँकाकडून पूर्ण झालेले नाही. याबाबत जिल्हा अग्रणी बँकांना वारंवार सूचना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे . बँकांच्या अकार्यक्षमतेची झळ मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे, यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी हवालदिल झाला आहे . बँकांना यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार आणि पाठपुरवठा करूनही अद्यापही त्यावर ठोस कारवाई आणि उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.तसेच याबाबत मराठवाड्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात यावी, मतदारसंघात राष्ट्रीयकृत बँकांची आणि कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी यासह आदी प्रश्नाबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेऊन मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत तक्रार करून वरील मुद्यांवर चर्चा केली.यावर मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मकता दाखवत योग्य ती पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले असून लवकरात लवकर बँकांच्या मनमानी कारभाराला आळा बसून बळीराजाच्या पीक कर्जाचा प्रश्न मार्गी लागणार आहे .खासदार हेमंत पाटील यांनी मांडलेल्या इतर मागण्याबाबत ही मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखविली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा